मुंबई : मोठ्या शहरांमध्ये भीक मागणाऱ्या काही व्यक्तींकडे मोठं घबाड सापडल्याचं आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो. मुंबईत भीक मागणाऱ्या एका महिलेची कहाणी काहीशी वेगळी आहे. गेल्या आठवड्यात या महिलेचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पद स्थितीत आढळला.
या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या महिलेच्या हत्येचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबईतली मंदिरं, मशिदी आणि दर्ग्याच्या बाहेर, तसंच फुटपाथ, रस्त्यांवर भीक मागणाऱ्या शांताबाई कुऱ्हाडे (वय 79) आता हयात नाही. ही महिला दरमहा 25 ते 35 हजार रुपये कमावत होती. यापैकी 25 हजार रुपये ती दरमहा तिच्या कऱ्हाडमध्ये राहणाऱ्या एकुलत्या एक मुलीला पाठवत होती आणि उरलेले पैसे स्वतःच्या खर्चासाठी वापरत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पैशांतून शांताबाईच्या मुलीने आणि नातवाने सुमारे तीन एकर जमीन खरेदी केली होती. या जमिनीतून ते कापूस, सोयाबीन, तसंच इतर पिकं घेत आहेत. उर्वरित जमिनीवर घरं बांधून त्यातून मिळणाऱ्या भाडेपट्टीतून लाखो रुपये कमावत आहेत.
या प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात हत्या आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं बैजू महादेव मुखिया (वय 45) याला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं, की सुरुवातीला बैजू पोलिसांसमोर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. कडकपणे चौकशी केल्यावर त्याने शांताबाईची हत्या केल्याचं कबूल केलं. आरोपी बैजू बिहारमधल्या मधुबनीतल्या झंझारपूर पुरानी बाजार इथला रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तो मुंबईत आला आणि मजुरी करू लागला. मालाडमध्ये ज्या घरात शांताबाई राहत होती, त्याच खोलीत तो भाडेतत्त्वावर राहत होता; पण नंतर भाडं न दिल्याने घरमालकाने त्या घरातून बैजूला काढलं आणि ते घर चार हजार रुपये महिना भाड्यावर शांताबाईला दिलं. बैजूनं भाडं न दिल्याने गेल्या महिन्यात घरमालकानं त्याला घरातून बाहेर काढलं होतं. राहिलेलं भाडं न दिल्याने त्याचं सामानही घरमालकानं आपल्याकडे ठेवलं होतं.
सुमारे 38 वर्षांपूर्वी शांताबाई मुंबईत आली. तिचा पती गावात शेती करत होता. दोन वर्षांनंतर पतीचा मृत्यू झाला. तिला काम मिळत नसल्याने शेतजमीन विकून ती मुंबईत आली आणि भीक मागू लागली. ती सुमारे 35 ते 36 वर्षांपासून मुंबईत भीक मागत होती. भीक मागून तिनं तिच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह मोठ्या धूमधडाक्यात केला होता. शांताबाई मालाडच्या चिंचोली बंदर परिसरातल्या विठ्ठलनगरमध्ये भाडेतत्त्वावरच्या एका घरात अखेरच्या श्वासापर्यंत राहत होती. या घराचं चार हजार भाडं ती घरमालकाला देत असे. मागच्या आठवड्यात शुक्रवारी शांताबाईचा या घरात संशयास्पद मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपी बैजूनं घरमालक नसताना घरात ठेवलेलं सामान बाहेर काढण्यासाठी लोखंडी पत्रे काढून जुन्या घरात प्रवेश केला. त्या वेळी घर रिकामं असेल असं त्याला वाटलं. घरात घुसून सामान घेऊन फरार होऊ असा त्याचा विचार होता; पण घरात घुसल्यावर तिथं त्याला शांताबाई कुऱ्हाडे दिसली. ती बेडवर झोपलेली होती. तिच्याजवळ पैशाची बॅग ठेवलेली होती. बैजूने बॅगेतले पैसे चोरण्याचा प्रयत्न केला; पण आवाज ऐकून शांतबाई झोपेतून जागी झाली. तिने आरडाओरडा सुरू केला. आपण पकडले जाऊ या भीतीने बैजूने तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला. त्यानंतर तो पैसे न घेता घटनास्थळावरून फरार झाला.
डीसीपी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पीआय रवी अडाणे यांच्या टीमला माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. प्रकरणाचा तपास करताना घटनास्थळापासून थोड्या अंतरावर असलेले 50 सीसीटीव्ही फुटेज बारकाईनं तपासले गेले. घटना घडली तेव्हा एक संशयित व्यक्ती विनाचप्पल या परिसरात फिरताना दिसली. त्यांनी त्याचा शोध सुरू केला. गुप्तहेरांच्या मदतीने त्याचं लोकेशन मालाडच्या विजयनगर परिसरात मिळाले. तिथं सापळा रचून त्याला अटक केली.
शांताबाईने घरमालकाला डिपॉझिट म्हणून 15 हजार रुपये दिले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की शांताबाई तिच्या मुलीला आणि नातवांना भेटायला कधीतरी जात असे; पण तिचा जास्त वेळ मुंबईत भीक मागण्यात जात असे. ती एका मनी ट्रान्स्फर एजन्सीच्या माध्यमातून तिच्या मुलीला दरमहा किमान 25 हजार रुपये पाठवत असे. सध्या पोलीस वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा