मुदखेड / तालुका प्रतिनिधी
वर्तमान परिस्थितीत गावकुसाबाहेरच्या समाज बांधवांनी आपल्या कल्याणासाठी सत्तेत यावे. साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे विचार वाचून आत्मसात करण्यासह कौटुंबिक कार्याबरोबर बहुजन समाजाने राजकीय व सामाजिक चळवळ अधिक प्रभावीपणे गतिमान करण्यासाठी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांनी डोणगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोलतांंना केले.
यावेळी डॉ.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा श्रीमती सावित्रीमाई साठे, गणेश भगत, मानवहित लोकशाही पार्टीचे जिल्हाध्यक्ष मालोजी वाघमारे, तालुकाध्यक्ष आकाश सोनटक्के, नगरसेवक प्रतिनिधी चांदु बोकेफोड, पोलीस पाटील राजेंद्र हामंद, तंटामुक्ती अध्यक्ष रंगराव हामंद, सरपंच सौ.अनुसयाबाई बोबडे, उपसरपंच राजू गंड्रस, सकाहरी बोबडे, राजेश पा.हामंद, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सहसचिव संजय कोलते, पुंडलिक सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्या सौ.ज्योती मस्के, ग्यानोबा सूर्यवंशी, सरस्वतीबाई पांचाळ, व्यंकटी सोनटक्के, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जयंती सोहळ्याच्या आयोजनाची सविस्तर भूमिका पत्रकार प्रल्हाद मस्के व जयंती मंडळाचे कार्यकर्ते रमेश सूर्यवंशी यांनी विशद केली.
शाहीर माधव वाघमारे आणि त्यांच्या कला संचाने गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रल्हाद मस्के यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा